Thursday, January 09, 2025

श्री

 श्री 


अस्तीत्व शक्ती असल्यामुळे त्यात भाव असतो आणि क्रियाशील असते. ती स्वतः सिद्ध असते आणि त्यासाठी कुठलही "कारण", "हेतू" लागत नाही. ती आहेच. आपणही शक्तीचे रूप आहोत. शुध्द शक्तिकडे जाण्यासाठी भावांतून आणि क्रियेतून जाणे आले. हेच शक्तीचे "जागे होणे" असे म्हणतात. शक्ती आहे भगवंताची. 

रूपाला मर्यादा आहेत आणि ते वेगळेपण भासवते आणि तात्पुरते राहते ह्यावर विचार करणे नको. कारण कितीही विचार केले, तरी रूपाचा स्वभावात काही बदल होणार नाही, जर बुद्धीच्या भाषेत बघितले तर! 

इथे चिंतनाची गरज किंव्हा तिचे महत्वाचे स्थान आहे. चिंतन अशी क्रिया समजली पाहिजे की त्यात भाव शुध्द होत जातो आणि शेवटी शांत आणि स्वतः सिद्ध होतो. चिंतनात चिकित्सक वृत्ती किंव्हा तर्क लढवणे बाजूला ठेवायला लागते - किंबहुना त्याला शांत करायला लागते. शांत होणे ही क्रिया आहे, तो क्षणाचा निर्णय नसावा. म्हणजे घडामोडी गूढ असतात, ह्याची प्रचिती आणि स्वीकार होणे आवश्यक. घडामोडी फक्त बुद्धीच्या भाषेत समजून घेण्यात गफलत आहे. म्हणून गोष्टी दैवी क्रियेतून साखळी निर्माण करत येतात, वावरतात, बदलत राहतात आणि विलीन होतात - हे ओळखणे. दृष्यावरच फक्त लक्ष केंद्रित केले (जे बुद्धी करते); तर गूढ क्रिया मान्य होणे कदाचित कठीण जाईल. म्हणून दृष्यचाही उगम गूढ आहे (जसा बुद्धिचाही किंव्हा माझा ही) हे ओळखणे, मान्य करणे, स्वीकारणे. म्हणजे अट्टाहास आणि अहं भाव सोडून देणे. मी पण सोडून देणे. 

कसे पुढे घडेल ह्याची अजिबात चिंता करू नये, कारण बुद्धीला टिंबा प्रमाणे जाणीव असते - तीच जाणीव शांत होण्यात सूक्ष्म आणि विशाल होते. श्रद्धा ठेवा त्या शुध्द शक्तीवर.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home