Tuesday, May 12, 2026

श्री

श्री 

 अस्तित्वाचे अनेक छटा आहेत. सबंध अपरिहार्य असतात. आपण विघटित होऊन, दृश्यात जन्म घेतो आणि संबंधित राहतो किंव्हा _बंधनात वावरतो_. बुद्धीच्या भाषेत बंधनातून मोकळे होणे म्हणजे खूप जर आणि तर, ह्या भाषेत विषय मांडणे, सुरुवात शोधत राहणे, साखळी समजून घेणे, अर्थ लावणे, दोष शोधणे, कोडी सोडवणे, अट्टाहास ठेवणे, वगैरे, असे होते. विवेकाने बघायला हवे की ह्याच स्वभावाचा उपयोग कसा होतो आणि कुठे कष्ट होतात. थोडक्यात शांत होण्यासाठी बऱ्याच प्रकारे बुद्धीचा (किंव्हा रूपाचा)  वापर करायला लागतो. त्याला गुढत्व म्हणावे, जे एकाच पद्धतीने, सरळ रेष प्रमाणे नसणारही आहे. In that sense, nothing can be predicted beforehand and everything is 'alive' as an engagement. Therefore, everything is situated in "now". 

 It means that the past and the future (as projections of _set_ patterns of the mind) ought *not* to create any disturbance in the present moment, because they _needn't be logically linked_ through any set pattern. 

 म्हणजेच पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टींचा परिणाम किंव्हा उद्या येऊ पाहणाऱ्या गोष्टींची काळजी आपल्याला त्रस्त का करावी? त्या अर्थाने आपण कशानेही ठरत नसतो...आपण मोकळे असतो प्रत्येक क्षणात. त्या अर्थाने, "मोकळे" म्हणजे आत्ताच्या क्षणी जगणे आणि कर्तव्य करणे, भगवंताला सर्व अर्पण करणे. भगवंत म्हणजे "आत्ताचा क्षण". 

 इथे असे उल्लेख असतो मार्गावर जात राहताना, की भगवंताचे चिंतन आपलं लक्ष क्षणात स्थित करतात आणि त्यामुळे पूर्वीच्या गोष्टींचे वजन किंव्हा उद्याच्या गोष्टींचा प्रभाव क्षीण व्हायला मदत होते. 

 दुसऱ्या शब्दात म्हटलं तर गोष्टींचे होणे, वावरणे,गतिमान असणे, गुण असणे - हे भगवत इच्छेने असते असे आपल्याला ओळखता आले पाहिजे. म्हणजेच सर्व भगवंताला अर्पण करणे आणि आपण मोकळे व्हावे.

 हरि ओम

 

 श्री 

 प्रवाहात स्थिरता स्थित करायला लागते. स्थिरता हा भाव आहे, प्रवाहात प्रस्थापित होणारा. स्थिरतेमुळे प्रवाह थांबत नाही, पण त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. 

 प्रत्येक क्षणात बदल, तात्पुरतेपण, वेगळेपण, वृत्ती, चक्र, भाव, स्मरण - असे सामावलेले दिसते. आता ह्याला काय दोष म्हणावा का?!! ह्या सर्व गोष्टींना स्वीकारून शांतीचा संबंध प्रस्थापित होणे हिताचे ठरते स्वतःला. 

 वरील हालचालींमुळे बहुतांश निर्मिती "मर्यादा", "चौकट", "अहं भाव" ह्याची होते आणि त्यामुळे स्वार्थी संबंध प्रस्थापित होऊ पाहतात. त्यामुळे व्यवहार, तुझे, माझे, तात्पुरतेपण, वेगळेपण, ममत्व, स्थळ, काळ, आयुष्य, जन्म, मरण, अश्या संकल्पनेत किंव्हा अनुभवात गुंतायला होते.  _Pattern_ of living the existence. 

 ही सुरुवात ओळखून, शांतीकडे प्रस्थान होणे आहे. म्हणजेच सूक्ष्म स्तर किंव्हा सत्यात. म्हणजेच कुठल्याही हालचालींचे परिणाम न रुजू देणे. ह्यावरील उपाय अनेक असावेत बुद्धीतून आलेले, भावनेतून आलेले, कामातून आलेले. ज्योतिषशास्त्रात म्हणे अगोदरच असे २४ patterns नमूद केलेले आढळतात, की त्यात जीव कसा गुंतला जाणार असतो, ह्याचा अभ्यास! म्हणजे हे सर्व कळू शकते जीवाला! 

 तरीही त्याची चिकित्सा न करता, आपल्या हातात भगवंताचे चिंतन, असे रसायन आहे. त्यावर लक्ष केंद्रित करून, ते करायला लागावे. योग्य परिणाम होत राहील.

 हरि पाठ किंव्हा प्रवचन, अशा थोर लिखाणात "सुरुवात" अनुभवातून कसे होऊ द्यावे आणि कसे प्रश्न येत राहतील, असा काहीसा साचा आढळून येतो. म्हणून ज्योतिषशास्त्रातील किंव्हा उपनिषद्धातील patterns समजून घेण्याची तसदी न घेता आणि शक्ती खर्च न करता, सर्वात मूळ आणि सोप्पा उपाय म्हणजे नाम घेत रहावे श्रद्धेने. त्यातून परिणाम निश्चित योग्य होत राहील, असे सुचविले आहे.

 हरि ओम.

 

 श्री 

 स्वतःच्या आत, शंका दडलेली आहे. ती स्वीकारायला हवी, की शंका असून देखील, जे काही त्यातून जाणिवेत येत राहील, त्याने स्वतःला लेखू नये आणि शांत रहावे. शंका जाईल किंव्हा परिवर्तित होईल, तेव्हा होईल...त्या बद्दलही विचार चक्र प्रस्थापित होण्याची गरज नसावी. शंकेचे प्रयोजन असेलच अस्तित्वात, म्हणून ती ध्यानी येत राहते. 

 ह्या मार्गावरून जायचे आहे मला, तर तसे होणे आहे. त्यात येऊ पाहणारे संबंध, हालचाली, परिस्थिती, कामाचे स्वरूप, देणे देऊ लागणे - सर्व स्वीकारणे माझ्या हिताचे ठरेल. स्वीकारण्याची क्रिया रूपातून स्थित होत राहील, त्यालाही इतरांना स्पष्टीकरण देण्याची जरूरी नसते. ज्यांना कळते, त्यांना कळते. ज्यांना कळून घेण्याची इच्छा नसते, त्यांची जबाबदारी आपली नसते, मग तश्या व्यक्ती नात्यातली असो किंवा दूरचे कुणीतरी. 

 मार्ग आहे. तो घेणे आहे. आणि भगवंताचे चिंतन ठेवणे आहे.

 हरि ओम.

 

 श्री 

 इतके विचार ध्यानी का येत राहतात, ह्या रूपात काह्या पद्धतीने का, इतक्या प्रमाणात किंव्हा वेगात का - ह्याचे उत्तर भगवंताकडे आहे. विचार प्रस्थापित होणे आणि त्यातून खूप सारे संबंध होणे, स्मरण होणे, चक्र होणे - हे त्याचे कार्य आहे, म्हणून ते होऊ देणे शांतीने. जर सर्व त्याची इच्छा आहे, तर विचारातून जाणवणारे अर्थ, हालचाली...त्याच्याच इच्छेने होत असलेल्या हवे! *त्याची इच्छा* - असा भाव आपल्या आत संक्रांत व्हायला हवा. त्यासाठी विचारांची धारा सुरू राहत असताना भगवंताचे चिंतन करत राहावे.

 हरि ओम.

 

 श्री 

 मला असं वाटतं की सर्व भगवंत करतो. आपण एक निमित्त असतो, सूक्ष्मातून येणारे आणि तसेच निघून जाणारे. येणे आणि निघून जाणे, ह्यात हेतू असावा का?!! हा महत्वाचा प्रश्न आहे जीवाला, आणि ह्या आकारात पदार्पण करून तो प्रश्न निर्माण होणार. उत्तर आहे - माहीत नाही. पण ह्याने भांबावून जाण्याची गरज नाही. उत्तर माहीत नाही, ह्यातच "शोध" हा प्रकार प्रस्थापित होतो. त्याला वेळ द्यावे. उपद्व्याप करून, व्याकुळ होऊन काय हाथी मिळते का, ह्याचा विचार करावा. सर्व योग्य वेळी योग्य गोष्टी होतील. आपण शांत रहावे आणि भगवंताचे चिंतन करावे.

 चिंतन दररोज व्हायला हवे, कारण त्यातून संबंध स्वच्छ होत राहतात. धूळ साफ करण्यासारखे आहे. मन दररोज विचारातून काहीतरी निर्माण करत राहते, कुठेतरी गुंतत राहते, काहीतरी अपेक्षा ठेवते, व्याकुळ होते, धडपड करते, परिणाम भोगत राहते, चक्रात वावरत राहते. अशा वेळी नामस्मरण करण्याचा योग मनाने हाथी घ्यावा. 

 हरि ओम.

 


Friday, May 08, 2026

श्री

श्री 

 

शांत होत राहणे. एकटेपणाचे विशेष काहीही नसते... तो भ्रम असतो दृश्यात गुंतलो तर जाणवणारा. सर्व ठिकाणी भगवंताचे कार्य असते. त्याचे स्मरण आत्मसात होऊ देणे अंतःकरणात. म्हणजे अस्तित्व भाव काय आहे, हे जाणवायला हवे...त्यात स्थित व्हायला हवे. 

 

आयुष्यात हालचाली, बदल, संबंध अनुभवात राहणार असतात. त्याला प्रतिक्रिया द्यावी का, हे ओळखावे. कुठेही जरी मी शांत बसलो आणि काहीही बोललो नाही, तरीही ध्यानात भगवंताचे स्मरण सतत सुरू राहायला हवे. स्मरण हे कार्य आहे, ती फक्त आठवण नाही. किंबहुना आठवणीला शुद्ध कार्याचे स्वरूप आले, की भगवंताचे चिंतन होते, असे ओळखावे. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

सर्व गोष्टी होतात. आपण काही करत नसतो. गोष्टी होण्याची शक्ती किंव्हा कार्य भगवंताकडे असते, ज्याच्यामुळे आपल्याकडून एक स्मरण किंव्हा रूप धारण केलं जातं. हे सर्व आपोआप होते आणि होत राहते. सर्व प्रकार वर्तमान काळात स्थित झालेला ओळखावा. Only is. पूर्वीच्या गोष्टींचा अर्थ, साखळी, आत्ताचे विषय, उद्याचे अर्थ - ही _कल्पना_ निर्माण होते. बदल, संबंध देखील _कल्पना_ आहे, जी कार्यातून निर्माण होते. कल्पना इथे perception, ह्या अर्थाने अधिक संबोधले आहे. कारण त्यातूनच निश्चय केला जातो, परिणाम होतो, भोग सामोरे जायला लागतात, चक्र वावरत राहतं, वगैरे. 

 

ध्यानी संपूर्ण स्तर आत्मसात व्हायला हवे - स्थुलातून सुरुवात करून सूक्ष्म प्रकृती पर्यंत....तरच दृश्यात होणाऱ्या घडामोडींची बाधा कमी होते. कल्पना सध्याची इतकी जबरदस्त आहे, की त्यातून स्मरण, भाव, संबंध, बदल अशा गोष्टी सतत ध्यानी येत राहतात आणि काहीतरी खटपट करायला भाग पाडतात. 

 

कल्पनेचे मूळ स्वरूप काय असते, हे ओळखण्यासाठी नामाचा पाठ करत राहावे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

मी विचारातून सिद्ध होत नसतो, किंबहुना तसा हेतू ठेवू नये इतरांसाठी. रूपातून "मी" आहे, अशी समजूत होते. खरे पाहिले तर फक्त अस्तित्व भाव आहे, जे स्वतः सिद्ध असते, ज्याला दृश्यांची उपाधी लागत नाही. किंव्हा दृश्याच्या भाषेतून त्याला समजून घेता येत नाही. 

 

परिस्थितीचे रूप गूढ असते, ज्याला फक्त भगवंताची इच्छा कारणीभूत असते, म्हणून मी काय, स्वतःला वाटणे काय, व्यवहार काय - संपूर्ण संकल्पना आहेत, सत्य नाही. शंका त्यामुळे असणे योग्य आहे, कारण स्वतःच्या मूल्यांना आपण घट्ट धरून ठेवत नाहीत. अपुरेपण किंव्हा तात्पुरतेपण वाटणे महत्वाचे आहे, कारण त्यातूनच मार्ग निवडला जातो आणि स्थिरता प्रस्थापित होते. 

 

दृश्यात _प्रवास_ लिहिलेला आहे, अनुभव ध्यानात येतील, प्रवाह असेल, संबंध असतील, भोग येतील, स्मरण असेल...प्रवास कसा असेल, ह्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावे. सगळे उत्तरे त्या क्षणात माहित नसतात आणि बुद्धीने सगळी उत्तरे माहीत झाली तरी "समाधान" त्यात साठवलेला नसतो! तात्पर्य, बुद्धीने गोळा बेरीज करा, रेष आखा, पहिले काय ह्याचा मागे लागा, शेवट कुठे होणार ह्याचा विचार करा, कोडी सोडवा, स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करा - *तरीही* समाधानाची भाषा वेगळी असते, आणि ती म्हणजे शांत होऊ पाहणे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

सर्व विचार एकमेकात _संबंधित_ असतात किंव्हा होतात. त्यात सुरुवात कुठे आणि शेवट कुठे असे समजून घेणे कष्टी करते स्वतःला. म्हणून, आपण जिथे कुठे आहोत, त्याला प्रवास मानून शांत होण्याचे चिंतन सुरू करावे. असलेला क्षण, ह्याला "सुरुवात" मानावे आणि शेवट म्हणजे भगवंत भावात स्थिरावणे.

 

बुद्धीच्या मार्गातून सुरुवात शोधणे, एका प्रकारे व्यर्थ असते किंव्हा त्यातून दमायला होते. हे ओळखल्यावर, बुद्धी सर्व निर्मिती स्वीकारायला लागते, श्रद्धा वाढायला लागते, भोग स्वीकारले जाते आणि शांती रस आत्मसात होते. 

 

हे सरळ तत्वद्न्यान आहे, जीवाच्या स्वभावाशी निगडित करताना, दृश्याचा अर्थ समजून घेताना आणि सत्याचे अस्तित्व मानून घेताना आणि संबंधांची जागा ओळखताना, ज्यावरून मार्ग पत्करावा लागतो कधी ना कधीतरी.  

 

मूळ प्रश्न अस्तित्वात वावरताना असा प्रकट व्हायला लागतो की - "आपण" म्हणजे कोण?! हा काय प्रकार असतो? "इथे" कुठून येतो, काय करतो, का करतो, कुठे जातो?! कार्य म्हणजे काय? विचार आणि भावना म्हणजे काय? त्यावरून दृश्याशी संबंध कसे स्थित होतात आणि _का_? ह्या प्रश्नातून आपण "जागे" व्हायला लागतो झोपेतून (किंव्हा विस्मरणातून) आणि शांतीचा मार्ग प्रस्थापित व्हायला लागतो. हा प्रवास सोप्पा नाही तसा, तरी ह्याला पर्याय नाही. 

 

रूप निर्माण करणे आणि त्यात आपला जीवाचा भाव प्रस्थापित करणे, हा खेळ भगवंताची शक्ती करत राहते. जे रूप घेऊ, त्याचे संस्कार किंव्हा स्वभाव आपण धारण करतो (वासना धारण करते). त्यातून संबंध आतील घडामोडींशी आणि इतर निर्माण झालेल्या रुपाशी होत राहतात. आणि ह्या चक्रात वावरणे स्थित होते. त्यावरून येणारी परिस्थिती आणि भोग. 

 

असो...असे अनुभवात येणे आहे. प्रवास होणे आहे. प्रवाहात राहणे आहे. देणे आहे. त्या अनुश्रुंगाने, चिंतन होणे आहे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

दुसऱ्यांच्या वासना शांत करण्याचा ठेका आपण घेत नसतो, आणि तो स्वतःच्या बुद्धीतून हे कोड सुटणे कठीण. इतरांच्या वासना शांत नाही झाल्या तरी त्यातून स्वतःला लेखण्याची गरज नाही, किंव्हा ती स्वतःची जबाबदारी असते, असेही म्हणून घेण्याची गरज नाही. 

 

म्हणजे थोडक्यात स्वतःची वासना इतर वासनांशी संबंधित राहण्याची/ ठेवण्याची गरज नाही/ परावलंबित राहण्याची गरज नाही. संबंध हा गूढ भाव आहे, तो फक्त बौद्धिक नाही. खूप साऱ्या स्तरातून "संबंध" प्रस्थापित होतात "इतर रूपांशी". 

 

म्हणून त्रासेचे मूळ खूप खोलवर असते, गूढ असते आणि स्वतःच्या मनाशी निगडित असते. ह्याचा अर्थ हा, की सर्व प्रश्नांचे उत्तरे स्वतःला शुद्ध होण्यात सामावलेले असतात...इथे दुसरा कुणी काहीही करणे अवघड. 

 

वरील सत्य विधान पचवायला खूप वेळ किंव्हा प्रयास लागू शकतो. त्यासाठी हा प्रवास दिलेला असतो, हे अनुभव येऊ पाहतात, वगैरे. त्याला काही करायचे असते, असे नाही. ते येऊ द्यावे आणि जाऊ द्यावे. येणे आणि जाणे, ह्यावरून वासनांचे नियंत्रण किंव्हा हेतू किंव्हा सिद्धत्व ठरवू नये. 

 

दुसऱ्या भाषेत हे सांगायचे आहे की मनाचा स्वभाव सतत कुठल्यातरी निर्मितीत, हालचालीत, गोष्टीत गुंतून राहण्याचे बघतो, विषय मांडतो, हेतू धरून ठेवतो, अहं वृत्ती बाळगतो, एखाद्या स्मरणेला पकडून ठेवतो, कसल्यातरी बिंदूत गुंतून स्वतःची सार्थकता मानतो. 

 

ह्याच स्वभावात शांतीचे संस्कार स्थित होऊ द्यावे लागतात. 

 

हरि ओम

 

 

श्री 

 

देह, भावना, बुद्धी, वासना - ह्यांना धरणे, म्हणजे तेच ते चक्र ध्यानात वावरत राहणे आणि त्यातून स्मरण होणे अस्तित्वाचे. ह्या चक्रात सुरुवात, शेवट, पहिले, नंतर, गुंता - ह्याचे काहीच स्पष्टीकरण होत नाही. म्हणजे सर्व विश्लेषणच मानायला हवे, की *अस्तित्व असल्यामुळे*, हे _चक्र प्रत्ययास येऊ पाहते_ आणि ध्यानात येते आणि मन करते आणि परिणाम देते. 

 

चक्र अनेक स्तरात असते आणि त्याच्या कार्यामुळे स्मरणांचा अर्थ प्रस्थापित होतो. त्यात कुठेतरी आपली ज्याची जाणीव प्रस्थापित होते आणि त्या चक्राला आपण "प्रपंच" म्हणून ओळखतो!...

 

तरीही प्रपंचाची जाणीव आणि उगम सूक्ष्म प्रकृतीतीशी संबंधित असतो, म्हणून प्रपंचात सर्व स्तराचे स्थान असते आणि ते सर्व स्थान सध्याच्या प्रपंचाचे स्वरूप ध्यानी आणत राहते. 

 

म्हणून मन दृश्यात सत्यात पदार्पण करू शकते. त्याला "मार्ग" म्हणावा.

 

एकंदरीत मन कशालाही धरू शकते आणि काहीही निर्माण करू शकते.  हे विसरू नये. त्यातून अस्तित्व स्पष्ट अनुभवात येऊ पाहते.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

काही गोष्टींचे कारण, की आपण असे का करतो, आणि असे विचार का येऊ पाहतात, हे कळत नसते...पण काहीही हरकत नसावी. विचार आणि भावना, ह्यांचे स्थान भगवंताची शक्ती ठरवते, म्हणून त्यांची निर्मिती, वावर, बदल, संबंध, कार्य, हे राहणारच. ह्यालाच श्रद्धा म्हणायची. की सर्व जे काही घडामोडी होऊ पाहतात किंव्हा जाणवत राहतात, ते भगवंताच्या इच्छेमुळे रूप आणि आकार घेतात, बदलत राहतात आणि विलीन होतात. 

 

म्हणून शांत वाटून घेण्यासाठी आपण एखादी जागा, वेळ, वस्तू, विचार, भावना, व्यक्ती शोधतो. त्या वस्तूत शांती नसून, तो प्रसंग आपल्याला शांत करतो, म्हणून त्याकडे आपण ओढले जातो. 

 

खरी शांतता अर्थात आत डोकावून स्थित व्हायला हवी, मग कशाचीही जरूरी नसते. तरीही, ते साध्य होण्यासाठी सगुण शांततेचे स्मरण ठेवावे आणि तसे संस्कार मनाला देत राहावे. सगुण परावलंबिक, रूप, आकार घेऊन असते. म्हणून एखादा चांगला गुण जर स्थित व्हायचा असेल, तर सगुणात ओळखून, त्याचे चिंतन करून, निर्गुणात प्रवेश करायला लागते. निर्गुण म्हणजे स्थळ आणि काळाच्या चौकटीच्या पलीकडे होणे.

 

त्या अर्थाने नामस्मरण सगुण स्मरण मानावे भगवंताचे. ते अखंड करत गेल्यामुळे मनाला निर्गुणाचे स्वरूप येते.

 

हरि ओम.