Tuesday, July 07, 2026

श्री

श्री 

कदाचित माझ्यासाठी _त्याग_ भावना आत्मसात करणे अभिप्रेत असावे आणि ते सुद्धा शंका आणि श्रद्धेतून. Critical thinking. 

विचारांचे स्थान, भावनांचे स्थान आणि त्यातून संबंधांचे स्वरूप, स्मरण, परिणाम - हा अनुभव "जीव" झाल्यामुळे/ त्याच्याशी एकरूप झाल्यामुळे "प्रस्थापित होतो". ह्या होण्याच्या गोष्टीला शांत केले/ शांत होऊ दिले की जो अनुभव उरतो, तो असतो शांतीचाच. म्हणजे रूप आणि आकार गेले तरीही अस्तित्व असतेच.  

हे जाणल्यावर सुद्धा त्या विलीन होण्याच्या क्रियेला सामोरे जायला लागते आणि खूप साऱ्या भावनांना स्वीकारावे लागते. विचार, भावना - एकंदरीत "पाहुण्या सारखे" त्याकडे बघावे. ते मुळात थोडे दिवस असतात आणि नंतर निघून जातात आणि हा प्रवाह सुरू राहतो. 

ह्याचा अर्थ की पाहुण्यात गुंतून राहणे योग्य ठरत नाही, कर्तव्य करावे लागते, आपुलकी प्रस्थापित व्हावी लागते आणि देणे करावे लागते. 

हरि ओम.

Monday, July 06, 2026

श्री

 श्री 


माझ्या मते, कुठल्याही भीतीला उत्तर देण्याची किंव्हा गुंता सोडवण्याची गरज तशी नसते. भीती, ही स्वाभाविक मानवी भावना ओळखली, तर तिला शांत होण्याचा मार्ग गूढ असतो, हे ओळखावे. 

भीती प्रवाहात असते, खूप गूढ असते आणि क्षणात सामावलेली नसते, जर आणि तर ह्या भाषेत नसते. म्हणून ती शांत होण्याचा प्रवास असतो. 

त्याला शांत व्हायला वेळ लागू शकतो...त्यावरून स्वतःला लेखू नये. भीती अशी का असते, हे सांगणे कठीण इतरांना आणि ते इतरांना कळेल अशी खात्री नाही आणि इतरांना कळली तरी ते साथ देतील असेही नाही. म्हणजे भीती परिस्थितीवर अवलंबून नसून, विचार शरणीत स्थित असते. त्यासाठी शांत होण्याचा मार्ग म्हणजे विचार शरणीत योग्य परिवर्तन होणे.

हरि ओम.

श्री

 श्री 


बहिर्मुखपणामुळे दृश्यात होणाऱ्या हालचाली, बदल, संबंधात, रूपात, आकारात आपण विषय शोधतो, गुंतून राहतो, चक्रात वावरतो, परिणाम भोगतो, स्मरणात असतो. हा अस्तित्व स्थितीचा _एक प्रभाव आहे_. 

"मी" हा भाव आहे किंव्हा एक प्रकारची शक्ती आहे, जिचे कार्य होत राहते. कार्य इथे म्हणजे भगवंताची इच्छा, म्हणून ते स्वीकारावे लागते. माझे होणे, असणे, वावरणे, कृती होणे, निघून जाणे - हे कार्य आहे. 

कार्य ह्याचा अर्थ की माझ्या कृतींना वैयक्तिक रंग लावण्याची गरज नसते. एखादी गोष्टी अशी का ध्यानात येते, अशी का परिणाम निर्माण करते, अशी का व्यवहारात ठेवते - ह्याची चिकित्सा करण्यात वेळ घालवण्याची गरज नसते. आपण तो वेळ घालवतो, कारण "मी करता" ह्या सर्वांगीण भावनेला खूप घट्ट धरून ठेवलेले असते. 

आता ह्याच सर्वांगीण अंतर्मुखातून प्रकट झालेल्या भावनेला शांत होऊ द्यायचे असते. म्हणजेच _कार्याचा_ भाव सर्वांगीण होणे अभिप्रेत आहे. 

हरि ओम.

Tuesday, June 30, 2026

श्री

श्री 

गोष्टींचे स्वरूप, धीमेपण, गर्दी, वेग, हळुवारपणा, क्षण, साखळी, एकातून एक, विघटन - हे ध्यानात येत राहते लाटाप्रमाणे. ते, त्यांना प्रश्न किंव्हा प्रतिक्रिया न देता, फक्त स्वीकारावे. 

रेषेची चिंता नसावी, न ध्येयाची, न गतींची, न हालचालींची, न क्षणांची. ध्यानात कुठल्या प्रकारे गोष्टी उलगडत जातील, ह्यावर शांतीने बघावे आणि स्वीकारावे.

कार्य माझे नसते, तसेच कुणाचेही नसते. कार्य फक्त स्थित होते. मग त्या "फक्त असण्यात" आपण वावर करावे...

हरि ओम.

श्री

श्री 

बुद्धी किंव्हा मी हे रूप शांत होऊ देणे, हे जीवनाचे धोरण समजून घ्यावे. शांत म्हणजे सत्य आत्मसात होणे आणि मुळात अनुभवाचे बीज कुठून आणि कसे येते, हे ओळखता येणे आणि ते शांतीने स्वीकारणे. इथे _ओळखणे_, ही शुद्ध जाणीव होण्याचा परिणाम आहे, किंव्हा मन स्थिरावण्याचा.

विचार येऊ द्यावे आणि प्रवाह स्थित राहू द्यावे. विचार निघून जाऊ द्यावे. विचार येणे आणि जाणे, हे काल चक्र सुचविते, तर तसे होत राहू द्यावे. 

दररोज मन विषय निर्माण करून त्यात गुंतून राहते, चक्रात सापडते, इकडे तिकडे जाते आणि बेचैन होत राहते. ह्याला _अस्थिर_ स्वभाव म्हणावा. रुपात आणि आकारात आणि त्यांच्या हालचालीत गुंतून राहणे - हे अस्थिरतेचे लक्षण समजावे. त्याचे _कारणही गूढ_ असते, म्हणून ते ध्यानात येत राहणार. म्हणून प्रश्न असा निर्माण होतो की अस्तित्वात असल्यामुळे संबंध कसे होऊ द्यावे? 

मूळ संबंध स्वतःशी आहे, म्हणजे त्याच ओघाने - सत्याशी. म्हणून तो कसा शुद्ध करत रहावा, इथे लक्ष द्यावे. संबंध कुठेच पळून जात नाही. ते सामोरे जायला लागतात. म्हणून अभ्यास जो हाथी घ्यायला लागतो, तो संबंधांचा असतो. 

मन स्थिर होऊ द्यावे - असा मार्ग आत्मसात होऊ द्यावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट अस्तित्वातील म्हणजे स्थिरता. त्यासाठी नामस्मरण.

हरि ओम.

श्री

 श्री 


सर्व आयुष्य हे भगवंतासाठी असते. भगवंतातून दृश्य जगाच्या हालचाली ध्यानात येत राहतात, अनंत रूप, आकार, संबंध, स्मरण, हेतू, क्रिया असे ध्यानात येत राहते. 

म्हणजे सर्व काही होऊ द्यावे, संबंधित रहावे, परिणाम होऊ द्यावे. त्यातून जीवाला प्रश्न पडतात, शोध होतो, मार्ग पत्करला जातो आणि सत्य जे काही आहे, ते आत्मसात होते. 

परिवर्तन होत राहणे आणि आत - बाहेर (दुहेरी) परिणाम होणे, हे अपरिहार्य घटक आहेत जीवाच्या अस्तित्वात. म्हणून प्रश्न पडणारच आणि बेचैनी येणार आणि त्यातून _शोध_ होणार. 

ही मानसिकता कदाचित काही सांस्कृतिक समाजामध्ये नमूद केलेली आढळते. इतर ठिकाणी जास्त करून बौद्धिक शक्तीला प्राधान्य दिलेले आढळते. 

कुठेही जा, काहीही करा, कसलेही काम करा, कशातही स्वतःला गुंतून घ्या - सत्याचा शोध हा होणार - म्हणजे "समाधान" कशाने प्रस्थापित होते, शांत कशाने वाटते - ह्याचा शोध होणार. 

ते सांगता येते का, ते दाखवता येते का, ते कुठल्या आकारात सामावता येते का, त्यातून इतरांना मार्गदर्शन घडवता येते का - त्या मार्गावर जात राहताना योग्य काय ते कळते.  

इथे *प्रत्यक्ष* अनुभवाला प्राधान्य असते. _प्रत्यक्ष_ स्वतःच्या रूपातून प्रकट होणारी संकल्पना आहे, म्हणून मार्ग ज्याचा त्याचा असतो, शोध ज्याचा त्याचा होतो, प्रारब्ध ज्याचे त्याचे असते, परिणामांचे भोग ज्याचे त्याचे होते. हे सर्व शांतीने स्वीकारावे. एकातून अनेक होणे, संबंधित राहणे, तात्पुरते असणे आणि परत एकात विलीन होणे - हे चक्र आत्मसात होणे म्हणजे *शांत* होणे. 

हरि ओम.

Friday, June 26, 2026

श्री

 श्री 


स्वतः आतील विचारात गुंतून घेण्याची गरज नाही. मी भगवंत आहे, शांत आहे, सूक्ष्म आहे असे सतत आठवणीत राहू द्यावे. त्यासाठी प्रारब्धाची चिंता असू नये, त्यावर अवलंबून आणि सिद्ध होण्याची गरज प्रस्थापित करू नये,  सतत प्रतिक्रियेत राहण्याची गरज भासू नये. 

विचारातून चिंता निर्माण होत असली तर आपण प्रतिक्रिया देत आहोत, असे ओळखावे. एक तर अस्तित्वातून स्पंदने येणार. त्यातून वासना, विचार, भावना, देह अशा गोष्टीं द्वारे संबंध निर्माण होत राहणार, त्याचा परिणाम असणार, त्यात गुंतणे होणार. 

म्हणून _विचार_ किंव्हा त्याचा परिणाम शांती, ही भावना, प्रस्थापित होण्यासाठी महत्वाचे ठरते. आपल्या हातात *निर्णय* आहे. आणि तो असा घ्यावा की विचारातून योग्य *परिवर्तन* स्वतः मध्ये घडावे. त्याला कुणीही अडवू शकत नाही, शिवाय आपणच. 

हरि ओम.

श्री

 श्री 


आत्ता पर्यंत मी असे समजून घेत होतो की भगवंत कार्य किंव्हा भाव म्हणजे काय, जीव म्हणजे काय, त्यांच्यातील संबंध म्हणजे काय, स्मरण म्हणजे काय, मार्ग म्हणजे काय आणि विचारांचे + भावनांचे स्थान काय असते अनुभवात?

अस्तित्व कार्याला बरेच कंगोरे आहेत, ज्यांना आपण भगवंत, प्रकृती, हालचाली, भाव, विचार, संकल्पना, परिणाम, चक्र, हेतू असे काहीसे म्हणू. 

ह्यांची ओढाताण मनात होत राहते. विघटन आणि पूर्ण स्थिती - असे दोन भाव अस्तित्वात असतात. विघटनाचा मार्ग अधिक विघटित करतो आणि अंतर्मुख मार्ग स्वतःला पूर्ण करतो, शांत करतो. हा मोलाचा धडा आहे, कारण *निश्चय* त्यातून करायचा असतो. 

शंका असणार व्यवहारात गुंतत राहताना. पण त्याचे बीज समजून घ्यायला हवे आणि त्याचा स्वीकार करायला हवा. त्याला सैय्यम लागतो. मला वाटते की आकलनाच्या पलीकडे मन स्थिरावणे इतके नाम घेत रहावे. त्या मार्गावर जात राहताना खूप प्रकाराचे अनुभव येत राहतील जे स्वतःला बेचैनही करू शकतील. पण त्याच्या पलीकडे नजर कायम स्थित ठेवावी, म्हणजे अनुभवाचा योग्य स्वीकार होऊ शकतो. 

मी आहे तो असा आहे. अर्धवट वाटतच राहणार आहे, पण दोष स्वतःला किंव्हा परिस्थितीला किंव्हा कुठल्याही वस्तुला देण्याची गरज नाही. फक्त सर्व शांतीने बघावे.

हरि ओम.

Saturday, June 20, 2026

श्री

 श्री 


भावना खूप गूढ असतात. आपण शब्द वापरून त्यांना राग, भीती, दुःख, गुंतून राहणे,चिकित्सा - असे काहीसे स्वरूप त्यांना देतो. स्वरूप देण्याच्या नादात अशी अपेक्षा होते की ते मर्यादित आहेत आणि त्यांना विषय म्हणून आपण सोडवू शकू आणि त्यांच्यामुळे आपल्यात दोष असावा. 

स्वीकार करावा ह्या निर्माण झालेल्या परिस्थितीत. खूप बदल, संबंध, मने, धारा, नाती, हालचालींशी संबंध _प्रस्थापित_ होत राहतो. अगदी बाहेरील कुणा वस्तूवर नाही, तरी आतील सर्व स्तरांशी तर होतो! कुठल्याही संबंधांची निर्मिती भगवंत माध्यमातून प्रकट होते, म्हणून सर्व हालचाली आपल्या ध्यानात येत राहतात आणि त्यांच्यात गुंतले जाते, तसे स्मरण होते, तसे विचार येऊ पाहतात आणि तसे व्यवहार घडतात. 

हे चक्र असे का असते आणि ध्यानात येते - ह्या _चिकित्सेत गुंतणे शिथिल होऊ द्यावे लागते_. चक्रातून ठामपणे "मी" अशी संकल्पना ठरत नाही. मी - हा भाव धारण झाला आहे, त्यामुळे त्याचा परिणाम ओढला जातो. मी - हा भाव शांत होत गेला, की सर्व _शांत_ म्हणून जाणवायला लागते. 

अट्टाहासाने काहीही करू नये, घाई करू नये. योग्य पद्धतीने सर्व योग्य होते. आपण श्रद्धा बाळगावी. हालचाली, प्रवाह, विचार, भावना, वर्तन, शब्द, ऐकणे, बघणे, बोलणे - सर्व शांतीने करावे. 

हरि ओम.

श्री

 श्री 


अस्तित्व स्थितीत असताना, कार्याचा परिणाम मनावर खूप होत असतो - जो स्तर, संबंध, भाव, वासना, विचार, भावना, देह, स्मरण, जाणीव - अशा साऱ्या पद्धतीने मांडता येतो. ह्या सर्व हालचालींचे किंव्हा स्तरांचा परिणाम दृश्याशी संबंधितही असतो. थोडक्यात भगवंत भाव, अस्तित्व, जाणीव, मन, सबंध, दृश्य हे  अनुभव जोडलेले असतात. 

माझ्या मते, स्वतःला _विचार_ ह्या शक्तीशी नाते खूप महत्त्वाचे ठरते. असे वाटते की सूक्ष्म स्तर ते भावना आणि देह ह्या सर्वांचा परिणाम जर उमटत असेल आणि जाणवत असेल जीवाला तर तो आहे *विचारांचे* मध्यम. म्हणून विचारांना बहिर्मुख खेच असते (तसे नाते/ स्मरण/ गुंता/ अपेक्षा प्रस्थापित होते), *आणि* अंतर्मुख जाणण्याची ओढ (सूक्ष्म, स्थिर, कायम, सत्य अस्तित्व). इथे निश्चय लागतो की अस्तित्वाची जाणीव कशी प्रस्थापित करावी?  

असे म्हणतात की प्रारब्धाची सीमा देहा पुरती आणि नंतर विचारां पुरती मर्यादित ठरते. त्याहून जर जाणीव सूक्ष्म झाली, तर प्रारब्धाच्या पलीकडे अनुभव स्थित होऊ शकतात. मग इथे अनुभव ह्यांना देखील सीमा राहत नाही, किंव्हा ती स्थिर, सूक्ष्म, शांत होते. 

पण हे सर्व खरे असते, हे मान्य करावे लागते. त्यामुळे मार्ग जोपासला जातो आणि वरील सूक्ष्म अस्तित्व आत स्थिरावते.

हरि ओम.

Wednesday, June 17, 2026

Shree

Shree 

Is life logical or beyond logic? What is logic? Are there states of logic? Is the logical, part of holistic vibrations? 

Are questions meant to prove or justify or carry out a search for self? Should questions be expressed or should they get revealed as required? 

विचार कसेही येऊ द्यावे, कारण त्यांना प्रसाद मानावा किंव्हा अस्तित्व कार्याचा एक भाग. प्रश्न सिद्ध करण्यासाठी असतात का, की ते नुसते असतात, नुसते निर्माण होतात, कुठेतरी वेगळाच अनुभव देतात आणि त्यातून वेगळे घडत जाते? There is a problem to view the _mind_ with a _function_ to question things, as if it was its sole purpose. Then that would mean a tendency to view a question in only a particular way and to perceive existence only in a particular way. कदाचित ह्यालाच गुंतणे किंव्हा अडकणे असे म्हणत असावेत!..किंव्हा अट्टाहास, अपेक्षा, अहं भाव!

A question needn't be a botheration. Question exists. And that's enough to keep revealing something or to keep the flow going.

Hari Om.


श्री 

प्रत्येक क्षण नवा असतो. म्हणजे त्याला मागची धारा आणि पुढची धारा जरी संबंधित असली, तरीही ह्या दोघांचा परिणाम आपल्या *क्षणाच्या प्रत्यक्षातील अनुभवात होता कामा नये.* The moment should always be *fresh* in our minds.

ह्याला दुसऱ्या भाषेत असे म्हणतात की प्रत्येक क्षणी भगवंताचे अस्तित्व/ कर्तेपण/ कार्याची ओळख वर्धमान झाली पाहिजे. म्हणजेच की विचारांच्या धाराचा परिणाम शिथिल व्हायला हवा किंव्हा त्या धारात गुंतण्याची गरज भासता कामा नये किंव्हा जाणीव सूक्ष्म झाली हवी...सगळे तात्पर्य एकच आहे.

विचारांचे येणे, प्रवाह, परिणाम, स्वभाव, कर्म करण्याची इच्छा - सर्व ठिकाणी भगवंताची शक्ती कार्य करत आहे, असे जाणवले हवे. ह्याचाच अर्थ की भगवंताच्या सूक्ष्म शक्तीचे अनुसंधान टिकले हवे कुठल्याही विचारांच्या स्थितीत. म्हणजेच मन स्थिर झाले, असे समजावे.

हरि ओम.

Saturday, June 13, 2026

श्री

 श्री 


रूप, आकाराला स्मरण असते, जे खूप सूक्ष्म स्तरातून हालचाली निर्माण होत स्थुलात _प्रकट_ होते आणि त्या स्थूल स्थितीचे व्यवहार इतरांशी/ द्वैताशी/ दृश्याशी प्रस्थापित करते. कार्याचा परिणाम म्हणजे द्वैताची निर्मिती आणि त्यातून होणाऱ्या स्थूल किंव्हा वेगळेपणाने जाणवणाऱ्या _हालचाली_ स्थळात किंव्हा काळात किंव्हा कृतीत किंव्हा स्वतःतच. दुसऱ्या अर्थाने हालचाली म्हणजे सबंध/ व्यवहार जे खूप आतून प्रस्थापित होत राहतात, म्हणून त्याचे पाया मुळे सापडणे अवघड जाते बुद्धीला. 

जे काही विचार आणि भावना उद्भवतात, हे ह्या स्थितीत साजेसे असे उद्भवत राहतात. विचार आणि भावना सूक्ष्म झाले, तर स्थितीही सूक्ष्म जाणवते आणि संबंधांचे रूपही त्यानुसार होते. म्हणजे हे सर्व प्रकरण गुंतले गेलेले आहे. 

म्हणून असा अभ्यास स्थित होतो की मनाला शांत कसे करावे आणि त्यातील हा प्रश्न पहिले की मन म्हणजे काय? ह्या प्रश्नाला तीन भाग आहेत. हा प्रश्न बुद्धीतून समजून घ्यायला लागतो आणि प्रत्यक्षात नामाचा आधार घ्यायला लागतो. आणि तिसरं म्हणजे "मी" ह्या संकल्पनेचा संबंध वरील अभ्यासात काय असतो? 

मला काहीही माहित नाही (गृहीत धरू नये कशाला) हे जाणवायला हवे. मी कशावरही निर्भर असत नाही, सत्य जर पाहिले. स्थळाची आणि काळाची परिस्थिती कशीही जरी प्रस्थापित होत राहिली, तरीही त्याने आपण काही सिद्ध करण्याची गरज नसते. आतील शांतता आणि सिद्ध होत राहण्याची प्रक्रिया - ह्यात काहीही संबंध नसतो/ तसा तो जोडण्याचीही गरज नाही. प्रारब्ध असतात आणि ते स्वीकारावे लागतात शांतीने. प्रत्येकाला प्रवास असतो. तो श्रद्धेने हाथी घ्यावा.

हरि ओम.