Thursday, July 16, 2026

श्री

 श्री 


अस्तित्व ह्याचा मूळ असण्याचे चिन्ह म्हणजे शांती भाव आणि त्यातून घडत राहणे कार्य. 

आपण शांतीचे प्रतीक आहोत, कुठल्यातरी स्थितीत कार्य घडत राहते. मूळ कार्य भगवंताची शक्ती कारणीभूत असते, जिच्यामुळे आपला व्यवहार स्थित होतो, विचार येत राहतात, भावना येत राहतात, गुंतणे होते, स्मरण होते वगैरे. कुठल्याही रूपाला आणि आकाराला भगवंताची शक्ती _कारण_ ठरते. 

आपण त्या शक्तीला बऱ्याच उपमा देतो. पण काहीही झाले, तरी ते शांती असते, ज्याला आपले रूप आणि आकार मागे टाकायला लागते. आपण संबंधात का येतो, हा गूढ प्रश्न आहे. त्याने व्याकुळ होण्याचे कारण नाही. तो प्रश्न शांती भाव आत्मसात करूनच पूर्ण ओळखता येईल. 

मी - ह्या संकल्पनेला महत्त्व नाही. तरीही निमित्त म्हणून मार्गावर राहणे. तेवढा अधिकार दिला असतो. काय दिसते, त्यातून तर्क मांडू नये आणि कुणाला काहीही लेखू नये. इथे भगवंतच विराजमान आहे. त्याला ओळखावे.

हरि ओम.


श्री 

प्रत्येक गोष्टीत, वस्तूत, प्रवाहात, चक्रात, भावात, जीवात शांत स्थिती किंव्हा भगवंत विराजमान असतो. त्याच्यामुळे हालचाली, कार्य, दृश्य जग, संबंध, विचार आणि भावना _घडत_ राहतात किंव्हा _निर्माण_ होत राहतात. Imagination. 

तो आहे, म्हणून हे सर्व आहे. संबंध आत्मसात होण्यासाठी त्याचे सतत चिंतन करावे लागते, म्हणजे स्वतःत _परिवर्तन_ घडावे लागते. 

त्याच्यामुळे _मी_ होत राहतो. मी, ह्या रूपाच्या पलीकडे त्याचे कार्य किंव्हा अस्तित्व असते, त्यामुळे बुद्धी किंव्हा भावना ह्यांना टप्पा मानायला लागते त्याला आत्मसात होऊ देण्यासाठी. टप्पा अर्थात विघटित किंव्हा आणखीन स्पष्टीकरण देण्याची साखळी नसते. स्पष्टीकरण दिल्याने सध्या काहीही फरक पडत नसतो, उलट वायफळ बडबड होण्याची शक्यता असते. ह्याला कारणही आहे. अहं भाव सतत सिद्ध होण्याचा प्रयत्न करत राहतो, म्हणून तो काहीही संकल्पना निर्माण करत राहतो, गोष्टी असो वा नसो. चिकित्सा करणे, विघटन करणे, बिंदू शोधत राहणे - ह्याने अहं भाव शांत होणे अवघड, कारण तोच तर त्याचा स्वभाव आहे! ह्यातून अपेक्षा, परिणाम, भोग, गुंतून राहणे - अश्या गोष्टी प्रस्थापित होत राहतात. 

शांत होण्याचा एकच मार्ग हा की शांती भावनेचे संस्कार मनाला देत रहाणे. त्यासाठी भगवंताचे चिंतन करावे.

जाणीव नेणीव भगवंती नाही I 
उच्चारणी पाही मोक्ष सदा II 

हरि ओम.

श्री

 श्री 


जीव खूप _परावलंबन_ , अशा संबंधात गुंतला गेला असतो - इतके की त्याचा ठाम पत्ता त्याला ओळखणे कठीण जाते. ह्याचा दुसरा अर्थ की भगवंताची शक्तीच कार्य करत असते, जिच्या अस्तित्वामुळे _जीव_ , हा भाव, प्रस्थापित होतो. हा सोप्पा अर्थ, खूप सोप्प झाल्या शिवाय ओळखणे कठीण जाते, कारण त्यात स्वतःचा अहं भाव मिसळून गोष्टी क्लिष्ट केल्या जातात. तरीही, स्वतः विघटित, परावलंबित आणि क्लिष्ट असून सुद्धा, परिस्थितीला टप्पा मानून मार्ग पत्करला जाऊ शकतो, ज्यामुळे सोपेपणा आत्मसात होऊ शकतो. स्वतःला सोपे करायचे असते. 

अहं भावाचे परिणाम अनंत. सत्व, रज, तम - अशा कुठल्याही स्वभावाचे जीव होतात त्यातून आणि त्यामुळे न्यूनपणा तैय्यार होतो. इथे प्रश्न आहे जीवाला. की ह्या भावनेतून सुटका असते का? असते, पण ती बुद्धीच्या मार्गातून बघण्यापेक्षा, तो मार्ग श्रद्धेचा असतो. श्रद्धेने आपण सूक्ष्म, अमर्यादित, स्थिर होतो. म्हणून ती भावना, जी कशावरही अवलंबून नाही, ती जागृत होऊ द्यावी. 

बुद्धीची शक्ती अजब प्रकरण आहे! त्यावर हक्क गाजवता येत नाही. सर्व घटक भगवंताकडून येतात, म्हणून त्या भावनेने बुद्धीकडे बघणे जरुरीचे ठरते. म्हणजेच की बुद्धीने वेगळेपण, गोष्टीना स्वरूप देणे, आकार देणे, प्रवाहाची मांडणी करू शकणे, प्रश्न निर्माण करणे, अपूर्ण असण्याचा अर्थ शोधणे, विश्लेषण तैय्यार करणे, कार्य प्रस्थापित होऊ देणे - अशा प्रवृत्ती असतात बुद्धीच्या.  "करणे" - हा _स्वभाव_ असतो/ बनतो बुद्धीचा. म्हणून कर्म तर होणार. 

हा स्वभाव जीवाने _धारण_ केला असतो...तो दिला गेला असतो. तोच स्वभाव परत भगवंताला द्यायचा असतो अपेक्षा न ठेवता. 

हरि ओम.

Saturday, July 11, 2026

श्री

 

श्री 

 

सगळ्यांना स्मरण, भाव, रूप, आकार आणि त्या प्रमाणे प्रवाहात राहणारी बुद्धी आणि भावना ध्यानात येत राहतात आणि संबंध जोडतात. त्यामुळे वेगळेपण किंव्हा तात्पुरतेपण, हा भाव संक्रांत होतो आणि तो प्रत्येक जीवाला गुंतवून ठेवतो. म्हणून प्रत्येक जीवाला बेचैनी, भीती, व्याकुळता ही येतेच. 

 

प्रश्न असा आहे, की अशा स्थितीत शांत होणे म्हणजे काय आणि ते कसे साधायचे? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा वाटल्या शिवाय मार्ग पत्करणे कठीण आणि त्यामुळे परिवर्तन होणे कठीण. 

 

रूपाचा एक परिणाम घडतो, त्याचा एक स्वभाव असतो, त्यामुळे चक्र प्रस्थापित होते. ह्यात बदल काय, संबंध काय, साखळी काय, पाहिले काय आणि शेवट काय - ह्यात चिकित्सा करण्यात विशेष तथ्य नाही...कारण मुळात तसे काही नसते, म्हणजे सर्व रूपाला मर्यादा असतात आणि त्यांना निमित्त मानून सत्य ओळखावे लागते. 

 

तरीही हे लिहिण्यात किंव्हा व्यवहारातही स्वतःचा स्वभाव असतोच, म्हणून लिहिण्यावरून काम संपत नाही आणि त्यावर शांती ठरत नाही पूर्णपणे. म्हणजे भगवंताला शरण जाणे हाच मार्ग ओळखावा. 

 

सर्व अस्तित्व भगवंताचे असते आणि त्यात आपण कुठेतरी निर्माण होत राहतो आणि विलीन होतो. हे हालचाली विधिलिखित असतात, म्हणून ते वाट्याला येत राहणार. त्या हालचालींच्या चक्राच्या निमित्ताने भगवंताला ओळखावे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

"जत्रा" हा शब्द एक प्रकाराचा अनुभव दर्शवतो माझ्या मते...ह्या शब्दातून गोंधळ, गोंगाट, चळवळ, अस्थिरता, बेचैनी, कष्ट, त्रास, घालमेल, धावपळ - अशा सर्व भावनांचे मिश्रण होत असावे. 

 

आपण बहुतांश बाजार किंवा गर्दीच्या कुठल्याही ठिकाणी वरील "जत्रा" शब्द लावू शकू. 

 

पण मनातील विचारांचे अमाप गोंधळ देखील "जत्रा" दर्शवते, नाही का? हे उघड आहे की वाढत्या लोक संख्येमुळे रस्त्यावर, कुठल्याही वास्तूत, शाळेत, बँकेत, पर्यटक स्थानात - कुठेही जा, जत्रा अनुभवात येतेच येते. पण, खूप विघटित मानसिक क्रियांमुळे (fragmentation and multitasking), जत्रा, हा अनुभव, मनात संक्रांत होऊ शकतो. म्हणजे मनाचा मार्ग जत्रा निर्मितीचा आहे आणि अध्यात्माचा मार्ग शांत होण्याचा. 

 

जीव म्हणलं तर मुळातच जत्रा, असा अनुभव, संक्रांत होत असतो अनेक रूप आणि आकार बघत राहताना. ह्या जत्र्यांमध्ये शांती भाव कसा प्रस्थापित होऊ द्यावे - हा मुळातील प्रश्न आहे आपल्याला. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

एकाच वेळेला स्वतःचे मन सैरबैर खूप ठिकाणी गुंतून राहत असतं - नात्यात, परिस्थितीत, रुपात, आकारात, वृत्तीत, विचारात, भावनेत, स्थळात, काळात, कामात, समस्यात, विषयात, चिंतेत, काळजीत, तात्पुरतेपणात, वगैरे....ह्याला अंत नाही अशा स्वभावाला - म्हणजेच सत्य ओळखले तर ह्या प्रवाहित असणाऱ्या अनुभवाच्या उगमाला "माझे" कर्तेपण नसते किंव्हा मी जबाबदार नसतो. जीवाची ही वरील _संकल्पना प्रकट_ होत असते आणि ती अस्तित्व माध्यमामुळे होत राहते. ह्या अनुभवाला प्रारब्ध, भोग, देहबुद्धी, अस्थिरता असेही संबोधले जाते. 

 

प्रश्न असा आहे, की हे कशातून शांत होतं आणि शांत होणे असा अनुभव महत्वाचा आहे का? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि मार्ग देखील त्याने शोधणे गरजेचा आहे. 

 

त्यासाठी "भगवंताचा" सत्यपणा पहिले मान्य करणे गरजेचा ठरतो आणि त्यातून शांतीचा मार्ग पत्करला जातो. त्यातून श्रद्धा, विलीन होणे, त्याग, अशा संस्कार मनाला देत रहाणे ठरते. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

"मी" हा भाव, क्षणाशी संबंध, शक्तीचे कार्य, परिणाम, चक्र - ही सर्व भगवंताची *इच्छा* ओळखावे. 

 

 *इच्छा* स्वतः सिद्ध आणि शांत माध्यम आहे, ते अस्तित्व आहे, ते जिवंत आहे, त्याचे कार्य आहे. इच्छे पोटी सर्व प्रकाराच्या हालचाली, सर्व स्तरात होत राहतात. त्या इच्छेतून अनेकपणा किंव्हा विघटित कार्य होत राहते - पदार्थ घडल्या जातात आणि मोडल्या जातात आणि हे कायम सुरू राहते. 

 

कारण *अस्तित्व* असतेच, त्यावर निर्भर असलेल्या सर्व घटना स्थित राहतात किंव्हा निर्माण होत राहतात. म्हणून अस्तित्वाला अंतर्मुख आणि बहिर्मुख असे दोन अंग आहेत, आणि त्या प्रमाणे अनुभवाचे स्वरूपही. 

 

"गगनाहूनी वाढ नाम आहे", असा उद्गार हरि पाठात उल्लेख केलेला आढळतो. म्हणजे स्वतःच्या अनुभवाचा _विस्तार_ अमर्यादित होऊ शकतो. म्हणजे अनुभवात स्तर, परिणाम, स्मरण, भाव, कार्य, व्यवहार, संकल्पना - ह्या साऱ्या गोष्टी येतात आणि त्यांच्या आपसात संबंधातून शांतीकडे वाटचाल होऊ पाहते.

 

हरि ओम.


Tuesday, July 07, 2026

श्री

श्री 

कदाचित माझ्यासाठी _त्याग_ भावना आत्मसात करणे अभिप्रेत असावे आणि ते सुद्धा शंका आणि श्रद्धेतून. Critical thinking. 

विचारांचे स्थान, भावनांचे स्थान आणि त्यातून संबंधांचे स्वरूप, स्मरण, परिणाम - हा अनुभव "जीव" झाल्यामुळे/ त्याच्याशी एकरूप झाल्यामुळे "प्रस्थापित होतो". ह्या होण्याच्या गोष्टीला शांत केले/ शांत होऊ दिले की जो अनुभव उरतो, तो असतो शांतीचाच. म्हणजे रूप आणि आकार गेले तरीही अस्तित्व असतेच.  

हे जाणल्यावर सुद्धा त्या विलीन होण्याच्या क्रियेला सामोरे जायला लागते आणि खूप साऱ्या भावनांना स्वीकारावे लागते. विचार, भावना - एकंदरीत "पाहुण्या सारखे" त्याकडे बघावे. ते मुळात थोडे दिवस असतात आणि नंतर निघून जातात आणि हा प्रवाह सुरू राहतो. 

ह्याचा अर्थ की पाहुण्यात गुंतून राहणे योग्य ठरत नाही, कर्तव्य करावे लागते, आपुलकी प्रस्थापित व्हावी लागते आणि देणे करावे लागते. 

हरि ओम.

Monday, July 06, 2026

श्री

 श्री 


माझ्या मते, कुठल्याही भीतीला उत्तर देण्याची किंव्हा गुंता सोडवण्याची गरज तशी नसते. भीती, ही स्वाभाविक मानवी भावना ओळखली, तर तिला शांत होण्याचा मार्ग गूढ असतो, हे ओळखावे. 

भीती प्रवाहात असते, खूप गूढ असते आणि क्षणात सामावलेली नसते, जर आणि तर ह्या भाषेत नसते. म्हणून ती शांत होण्याचा प्रवास असतो. 

त्याला शांत व्हायला वेळ लागू शकतो...त्यावरून स्वतःला लेखू नये. भीती अशी का असते, हे सांगणे कठीण इतरांना आणि ते इतरांना कळेल अशी खात्री नाही आणि इतरांना कळली तरी ते साथ देतील असेही नाही. म्हणजे भीती परिस्थितीवर अवलंबून नसून, विचार शरणीत स्थित असते. त्यासाठी शांत होण्याचा मार्ग म्हणजे विचार शरणीत योग्य परिवर्तन होणे.

हरि ओम.

श्री

 श्री 


बहिर्मुखपणामुळे दृश्यात होणाऱ्या हालचाली, बदल, संबंधात, रूपात, आकारात आपण विषय शोधतो, गुंतून राहतो, चक्रात वावरतो, परिणाम भोगतो, स्मरणात असतो. हा अस्तित्व स्थितीचा _एक प्रभाव आहे_. 

"मी" हा भाव आहे किंव्हा एक प्रकारची शक्ती आहे, जिचे कार्य होत राहते. कार्य इथे म्हणजे भगवंताची इच्छा, म्हणून ते स्वीकारावे लागते. माझे होणे, असणे, वावरणे, कृती होणे, निघून जाणे - हे कार्य आहे. 

कार्य ह्याचा अर्थ की माझ्या कृतींना वैयक्तिक रंग लावण्याची गरज नसते. एखादी गोष्टी अशी का ध्यानात येते, अशी का परिणाम निर्माण करते, अशी का व्यवहारात ठेवते - ह्याची चिकित्सा करण्यात वेळ घालवण्याची गरज नसते. आपण तो वेळ घालवतो, कारण "मी करता" ह्या सर्वांगीण भावनेला खूप घट्ट धरून ठेवलेले असते. 

आता ह्याच सर्वांगीण अंतर्मुखातून प्रकट झालेल्या भावनेला शांत होऊ द्यायचे असते. म्हणजेच _कार्याचा_ भाव सर्वांगीण होणे अभिप्रेत आहे. 

हरि ओम.

Tuesday, June 30, 2026

श्री

श्री 

गोष्टींचे स्वरूप, धीमेपण, गर्दी, वेग, हळुवारपणा, क्षण, साखळी, एकातून एक, विघटन - हे ध्यानात येत राहते लाटाप्रमाणे. ते, त्यांना प्रश्न किंव्हा प्रतिक्रिया न देता, फक्त स्वीकारावे. 

रेषेची चिंता नसावी, न ध्येयाची, न गतींची, न हालचालींची, न क्षणांची. ध्यानात कुठल्या प्रकारे गोष्टी उलगडत जातील, ह्यावर शांतीने बघावे आणि स्वीकारावे.

कार्य माझे नसते, तसेच कुणाचेही नसते. कार्य फक्त स्थित होते. मग त्या "फक्त असण्यात" आपण वावर करावे...

हरि ओम.

श्री

श्री 

बुद्धी किंव्हा मी हे रूप शांत होऊ देणे, हे जीवनाचे धोरण समजून घ्यावे. शांत म्हणजे सत्य आत्मसात होणे आणि मुळात अनुभवाचे बीज कुठून आणि कसे येते, हे ओळखता येणे आणि ते शांतीने स्वीकारणे. इथे _ओळखणे_, ही शुद्ध जाणीव होण्याचा परिणाम आहे, किंव्हा मन स्थिरावण्याचा.

विचार येऊ द्यावे आणि प्रवाह स्थित राहू द्यावे. विचार निघून जाऊ द्यावे. विचार येणे आणि जाणे, हे काल चक्र सुचविते, तर तसे होत राहू द्यावे. 

दररोज मन विषय निर्माण करून त्यात गुंतून राहते, चक्रात सापडते, इकडे तिकडे जाते आणि बेचैन होत राहते. ह्याला _अस्थिर_ स्वभाव म्हणावा. रुपात आणि आकारात आणि त्यांच्या हालचालीत गुंतून राहणे - हे अस्थिरतेचे लक्षण समजावे. त्याचे _कारणही गूढ_ असते, म्हणून ते ध्यानात येत राहणार. म्हणून प्रश्न असा निर्माण होतो की अस्तित्वात असल्यामुळे संबंध कसे होऊ द्यावे? 

मूळ संबंध स्वतःशी आहे, म्हणजे त्याच ओघाने - सत्याशी. म्हणून तो कसा शुद्ध करत रहावा, इथे लक्ष द्यावे. संबंध कुठेच पळून जात नाही. ते सामोरे जायला लागतात. म्हणून अभ्यास जो हाथी घ्यायला लागतो, तो संबंधांचा असतो. 

मन स्थिर होऊ द्यावे - असा मार्ग आत्मसात होऊ द्यावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट अस्तित्वातील म्हणजे स्थिरता. त्यासाठी नामस्मरण.

हरि ओम.

श्री

 श्री 


सर्व आयुष्य हे भगवंतासाठी असते. भगवंतातून दृश्य जगाच्या हालचाली ध्यानात येत राहतात, अनंत रूप, आकार, संबंध, स्मरण, हेतू, क्रिया असे ध्यानात येत राहते. 

म्हणजे सर्व काही होऊ द्यावे, संबंधित रहावे, परिणाम होऊ द्यावे. त्यातून जीवाला प्रश्न पडतात, शोध होतो, मार्ग पत्करला जातो आणि सत्य जे काही आहे, ते आत्मसात होते. 

परिवर्तन होत राहणे आणि आत - बाहेर (दुहेरी) परिणाम होणे, हे अपरिहार्य घटक आहेत जीवाच्या अस्तित्वात. म्हणून प्रश्न पडणारच आणि बेचैनी येणार आणि त्यातून _शोध_ होणार. 

ही मानसिकता कदाचित काही सांस्कृतिक समाजामध्ये नमूद केलेली आढळते. इतर ठिकाणी जास्त करून बौद्धिक शक्तीला प्राधान्य दिलेले आढळते. 

कुठेही जा, काहीही करा, कसलेही काम करा, कशातही स्वतःला गुंतून घ्या - सत्याचा शोध हा होणार - म्हणजे "समाधान" कशाने प्रस्थापित होते, शांत कशाने वाटते - ह्याचा शोध होणार. 

ते सांगता येते का, ते दाखवता येते का, ते कुठल्या आकारात सामावता येते का, त्यातून इतरांना मार्गदर्शन घडवता येते का - त्या मार्गावर जात राहताना योग्य काय ते कळते.  

इथे *प्रत्यक्ष* अनुभवाला प्राधान्य असते. _प्रत्यक्ष_ स्वतःच्या रूपातून प्रकट होणारी संकल्पना आहे, म्हणून मार्ग ज्याचा त्याचा असतो, शोध ज्याचा त्याचा होतो, प्रारब्ध ज्याचे त्याचे असते, परिणामांचे भोग ज्याचे त्याचे होते. हे सर्व शांतीने स्वीकारावे. एकातून अनेक होणे, संबंधित राहणे, तात्पुरते असणे आणि परत एकात विलीन होणे - हे चक्र आत्मसात होणे म्हणजे *शांत* होणे. 

हरि ओम.

Friday, June 26, 2026

श्री

 श्री 


स्वतः आतील विचारात गुंतून घेण्याची गरज नाही. मी भगवंत आहे, शांत आहे, सूक्ष्म आहे असे सतत आठवणीत राहू द्यावे. त्यासाठी प्रारब्धाची चिंता असू नये, त्यावर अवलंबून आणि सिद्ध होण्याची गरज प्रस्थापित करू नये,  सतत प्रतिक्रियेत राहण्याची गरज भासू नये. 

विचारातून चिंता निर्माण होत असली तर आपण प्रतिक्रिया देत आहोत, असे ओळखावे. एक तर अस्तित्वातून स्पंदने येणार. त्यातून वासना, विचार, भावना, देह अशा गोष्टीं द्वारे संबंध निर्माण होत राहणार, त्याचा परिणाम असणार, त्यात गुंतणे होणार. 

म्हणून _विचार_ किंव्हा त्याचा परिणाम शांती, ही भावना, प्रस्थापित होण्यासाठी महत्वाचे ठरते. आपल्या हातात *निर्णय* आहे. आणि तो असा घ्यावा की विचारातून योग्य *परिवर्तन* स्वतः मध्ये घडावे. त्याला कुणीही अडवू शकत नाही, शिवाय आपणच. 

हरि ओम.

श्री

 श्री 


आत्ता पर्यंत मी असे समजून घेत होतो की भगवंत कार्य किंव्हा भाव म्हणजे काय, जीव म्हणजे काय, त्यांच्यातील संबंध म्हणजे काय, स्मरण म्हणजे काय, मार्ग म्हणजे काय आणि विचारांचे + भावनांचे स्थान काय असते अनुभवात?

अस्तित्व कार्याला बरेच कंगोरे आहेत, ज्यांना आपण भगवंत, प्रकृती, हालचाली, भाव, विचार, संकल्पना, परिणाम, चक्र, हेतू असे काहीसे म्हणू. 

ह्यांची ओढाताण मनात होत राहते. विघटन आणि पूर्ण स्थिती - असे दोन भाव अस्तित्वात असतात. विघटनाचा मार्ग अधिक विघटित करतो आणि अंतर्मुख मार्ग स्वतःला पूर्ण करतो, शांत करतो. हा मोलाचा धडा आहे, कारण *निश्चय* त्यातून करायचा असतो. 

शंका असणार व्यवहारात गुंतत राहताना. पण त्याचे बीज समजून घ्यायला हवे आणि त्याचा स्वीकार करायला हवा. त्याला सैय्यम लागतो. मला वाटते की आकलनाच्या पलीकडे मन स्थिरावणे इतके नाम घेत रहावे. त्या मार्गावर जात राहताना खूप प्रकाराचे अनुभव येत राहतील जे स्वतःला बेचैनही करू शकतील. पण त्याच्या पलीकडे नजर कायम स्थित ठेवावी, म्हणजे अनुभवाचा योग्य स्वीकार होऊ शकतो. 

मी आहे तो असा आहे. अर्धवट वाटतच राहणार आहे, पण दोष स्वतःला किंव्हा परिस्थितीला किंव्हा कुठल्याही वस्तुला देण्याची गरज नाही. फक्त सर्व शांतीने बघावे.

हरि ओम.

Saturday, June 20, 2026

श्री

 श्री 


भावना खूप गूढ असतात. आपण शब्द वापरून त्यांना राग, भीती, दुःख, गुंतून राहणे,चिकित्सा - असे काहीसे स्वरूप त्यांना देतो. स्वरूप देण्याच्या नादात अशी अपेक्षा होते की ते मर्यादित आहेत आणि त्यांना विषय म्हणून आपण सोडवू शकू आणि त्यांच्यामुळे आपल्यात दोष असावा. 

स्वीकार करावा ह्या निर्माण झालेल्या परिस्थितीत. खूप बदल, संबंध, मने, धारा, नाती, हालचालींशी संबंध _प्रस्थापित_ होत राहतो. अगदी बाहेरील कुणा वस्तूवर नाही, तरी आतील सर्व स्तरांशी तर होतो! कुठल्याही संबंधांची निर्मिती भगवंत माध्यमातून प्रकट होते, म्हणून सर्व हालचाली आपल्या ध्यानात येत राहतात आणि त्यांच्यात गुंतले जाते, तसे स्मरण होते, तसे विचार येऊ पाहतात आणि तसे व्यवहार घडतात. 

हे चक्र असे का असते आणि ध्यानात येते - ह्या _चिकित्सेत गुंतणे शिथिल होऊ द्यावे लागते_. चक्रातून ठामपणे "मी" अशी संकल्पना ठरत नाही. मी - हा भाव धारण झाला आहे, त्यामुळे त्याचा परिणाम ओढला जातो. मी - हा भाव शांत होत गेला, की सर्व _शांत_ म्हणून जाणवायला लागते. 

अट्टाहासाने काहीही करू नये, घाई करू नये. योग्य पद्धतीने सर्व योग्य होते. आपण श्रद्धा बाळगावी. हालचाली, प्रवाह, विचार, भावना, वर्तन, शब्द, ऐकणे, बघणे, बोलणे - सर्व शांतीने करावे. 

हरि ओम.

श्री

 श्री 


अस्तित्व स्थितीत असताना, कार्याचा परिणाम मनावर खूप होत असतो - जो स्तर, संबंध, भाव, वासना, विचार, भावना, देह, स्मरण, जाणीव - अशा साऱ्या पद्धतीने मांडता येतो. ह्या सर्व हालचालींचे किंव्हा स्तरांचा परिणाम दृश्याशी संबंधितही असतो. थोडक्यात भगवंत भाव, अस्तित्व, जाणीव, मन, सबंध, दृश्य हे  अनुभव जोडलेले असतात. 

माझ्या मते, स्वतःला _विचार_ ह्या शक्तीशी नाते खूप महत्त्वाचे ठरते. असे वाटते की सूक्ष्म स्तर ते भावना आणि देह ह्या सर्वांचा परिणाम जर उमटत असेल आणि जाणवत असेल जीवाला तर तो आहे *विचारांचे* मध्यम. म्हणून विचारांना बहिर्मुख खेच असते (तसे नाते/ स्मरण/ गुंता/ अपेक्षा प्रस्थापित होते), *आणि* अंतर्मुख जाणण्याची ओढ (सूक्ष्म, स्थिर, कायम, सत्य अस्तित्व). इथे निश्चय लागतो की अस्तित्वाची जाणीव कशी प्रस्थापित करावी?  

असे म्हणतात की प्रारब्धाची सीमा देहा पुरती आणि नंतर विचारां पुरती मर्यादित ठरते. त्याहून जर जाणीव सूक्ष्म झाली, तर प्रारब्धाच्या पलीकडे अनुभव स्थित होऊ शकतात. मग इथे अनुभव ह्यांना देखील सीमा राहत नाही, किंव्हा ती स्थिर, सूक्ष्म, शांत होते. 

पण हे सर्व खरे असते, हे मान्य करावे लागते. त्यामुळे मार्ग जोपासला जातो आणि वरील सूक्ष्म अस्तित्व आत स्थिरावते.

हरि ओम.