Monday, March 23, 2026

श्री

 श्री 


प्रत्येक वासनेवर, विचारावर, भावनेवर प्रतिक्रिया दिली हवी किंव्हा त्याचे परिवर्तन व्यवहारात करायला हवे, असे काहीही नाही. तशी अपेक्षा जीव ठेवत राहतो, म्हणून दृश्याशी गुंतून राहणे, असे होते आणि परिणाम भोगला जातो. 

वासना, विचार, भावना हे सारे संबंध असतात दृश्याशी. त्यातून रूप आणि आकार घडते आणि त्या परिस्थितीशी संबंध जोडते. त्याला द्वैत किंव्हा अनुभव म्हणता येईल. इथे मनोरचनेची दृष्टी अहं वृत्तीची असते. 

ती दृष्टी शांत होणे अभिप्रेत आहे, म्हणजे भगवंताची जाणीव मनात प्रखर होणे, स्थित होणे, मन स्थिर होणे, सूक्ष्म होणे वगैरे. त्यामुळे वासनेचा, विचारांचा आणि भावनांचा स्वतःवर विपरीत किंव्हा स्वार्थी किंव्हा मर्यादित प्रभाव राहत नाही. त्याचा प्रभाव क्षीण झाला, तर त्यांच्या मुळे येऊ घातलेले सर्व संबंध - दृश्याशी - त्याचा ही प्रभाव मावळेल. म्हणजे आसक्ती कमी होते. ह्या सर्व क्रियेला "अंतर्मुख होणे" असे सांगितले आहे. 

There is also a transcendental space and time. In this concept or reality then, space and time aren't separated from the experience of self. There would also be an inquiry on if space comes first or self. But why _search_ for the first?! Searching for "first" brings up a cycle of things that eventually also dilute. 

हरि ओम.

Saturday, March 21, 2026

श्री

 श्री 


प्रत्येकाला भगवंत आपापल्या माध्यमातून, क्रियेतून, संबंधांच्या रूपातून, साखळीच्या रचनेतून *प्रस्थापित* करायला लागतो. म्हणजे हेच, की सर्व रूप आणि आकार आणि परिस्थिती आणि त्यातील संबंध हे भगवंताच्या *इच्छेने* येत राहतात. आपण जीव म्हणून जे होतो, वावरत राहतो आणि निघून जातो, हे ही भगवंताच्या विलासात होते. 

भगवंताच्या इच्छेला किंव्हा कार्याला कारण "नसते" किंव्हा निमित्त "नसते". आपल्या रुपाची सवय अशी आहे, की ते "मूळ" सापडल्याशिवाय गप्प बसत नाही. एका अर्थी हा शोध म्हणावा. 

विचार धारा किंव्हा स्पंदने ह्यावर कुणाचाही ताबा नसतो. ते भगवंताकडून आलेले असते, म्हणून त्यातून अनुभव येत राहतात प्रवाह प्रमाणे. ते _दुरुस्त_ करण्यात आपली शक्ती खर्च होत राहते कारण _दुरुस्त करणे_ ही जीवाच्या रूपातून आलेली संकल्पना आहे. परिणाम, जो भोगला जातो, तो आत आणि बाहेर असा उमटत राहतो किंव्हा जाणिवेत येतो. म्हणून _गुंतण्याचे प्रश्न_ निर्माण होतात. इथे प्रश्न म्हणजे परिस्थितीच्या रूपाचे चिंतन करणे आणि शांतीचा शोध होणे. 

ह्याचा अर्थ हा की काही प्रश्न खूप आतील मनस्थितीचे असतात. कदाचित ते आत्म्याचे असतात. त्याचे उत्तर अंतर्मुख होण्यामध्ये सापडते. 

अंतर्मुख होण्यासाठी प्रयत्न लागतात. पूर्ण अंतर्मुख होण्यासाठी भगवंताची कृपा लागते. 

मी जेव्हा बघतो व्यक्तींच्या व्यवहाराकडे, तेव्हा असे जाणवते की विषय किंव्हा कोडी परावलंबित झाल्यामुळे सर्व घोळ झालेला दिसतो आणि त्यात खूप गुंतणे होते. त्यातून त्याग आणि आपुलकी येणे, हे गूढ प्रकरण आहे आणि त्याला वेळ द्यायला लागतो. 

भगवंताची कृपा असतेच. ती जाणवण्यासाठी आपल्याला मार्गावर जावे लागते. तो मार्ग म्हणजे विघटित स्थळ आणि काळ ह्यातील धागा ओळखून सर्व एकच सत्य आहे, ही जाणीव होईस्तोवर प्रवास करत राहायला लागतो. मनाची रचना अशी की एकाच वेळेला एकाच गोष्टीचे दर्शन घडेल, मग त्यातून पुढचे दर्शन. असे करत करत, विचार आणि भावनेच्या माध्यमातून सर्व दर्शनाचा रोख भगवंत आहे, हे जेव्हा जाणवेल तेव्हा शांती रस प्रस्थापित होईल.

हरि ओम.

श्री

 श्री 


आपल्या जीवनात बदल आणि स्थिरता, अशा दोन्ही गोष्टींचा समावेश राहतो. आपले रूप होणे, वावर असणे, संबंध प्रस्थापित होणे, विलीन होणे, दुसऱ्या सूक्ष्म स्तरात पदार्पण करणे हे कधी होईल, कसे होईल वगैरे "माहीत नाही". बुद्धीच्या सर्व सामान्य  तर्कातून ओळखणे कठीण. एका चौकटीतून बुद्धी होते आणि तिची भाषा असते आणि तिचा वावर असतो. त्यामुळे व्याकुळता, भीती अशा गोष्टी निर्माण होतात आणि ते सोडवण्याच्या मागे बुद्धी लागते. चक्र. 

सांगण्याच्या पद्धतीत संबंध, जर, तर, पहिले, नंतर अशा गोष्टी असतात...ह्याचा अर्थ की कुठे लक्ष दिले की गाठ सुटेल, अशी भूमिका ध्यानात असते. किंव्हा स्पष्टीकरण, सिद्ध अशा भावना असतात. 

मुळात सर्व काही एकाच वेळेला स्थित असते, म्हणून पहिले काय आणि नंतर काय ह्याला फारसे महत्त्व असत नाही. सर्वांगीण शांत होणे अभिप्रेत आहे. तरीही बुद्धी दिलेली असल्यामुळे ती भाषा सोडणे कठीण. म्हणून आपल्या रूपातूनच पलीकडे स्थित व्हायला लागते. तो पर्यंत म्हणून प्रश्न, गाठ, भीती, बेचैनी, प्रयत्न, सैय्यम, श्रद्धा अशा गोष्टी ध्यानी येणारच. 

मनाच्या गुण धर्माला स्वीकारावे. ते काही वाईट नाही. त्यातून ध्यान भगवंताकडे वळवावे. 

हरि ओम

Wednesday, March 18, 2026

श्री

 श्री 


भगवंत आत मध्ये जाणवण्यासाठीचा मार्ग गूढ असतो. म्हणजे त्या मार्गात कुठलीही परिस्थिती येऊ घालू शकते. त्यात आपली स्थिरता आणि भगवंताचे चिंतन डगमग होता कामा नये. ह्याचा अर्थ हा की पूर्ण लक्ष सूक्ष्म माध्यमाच्या कार्यावर केंद्रित रहावे, जेणे करून दृश्यात हालचालींची (घडामोडींची, संबंधांची, परिणामांची, गोष्टींची, बदलांची) भीती वाटणार नाही. मन - हे वासना, विचार, भावना आणि देह ह्यातून कार्य करते आणि त्या कार्याचा _परिणाम_ म्हणजे स्मरण/ अनुभव/ द्वैत/ दृश्य. 

मनात जर जाणीव भगवंताच्या (किंवा शुद्ध) कार्याची संक्रांत झाली, तर परिणामही तसाच होईल, म्हणजे शांती रस प्रस्थापित होईल. 

ह्याचा अर्थ की अस्तित्वात अनेक गोष्टी असतात ज्यामुळे "गुंतणे" हा अर्थ किंव्हा स्वभाव प्रस्थापित होतो. सर्वांगीण चिंतनाने सारे प्रकाराचे गुंतणे भगवंताशी संबंधित व्हायला लागतात आणि शुद्धता प्राप्त व्हायला लागते. तो अभ्यास चालू ठेवावा.

हरि ओम.

श्री

 श्री 


शांत असावे आणि सर्व हालचाली बघत रहावे. त्यात गुंतण्याची जरुरी नाही. गुंतण्याची गरज, म्हणजे हेतू निर्माण करून हालचालींना अर्थ देणे आणि प्रतिक्रिया देणे ह्याचा अर्थ आपण परावलंबित समजतो स्वतःला, चौकटीत व्यवहार करतो, वृत्तीतून स्मरण ठेवतो, तात्पुरते वाटून घेतो, *व्ययक्तिक* करून घेतो हालचालींना आणि म्हणून त्या अर्थाचे परिणाम साहजिकच भोगतो. 

व्ययक्तिक वाटून घेण्याची काय गरज आहे घडामोडींना?!...हा अत्यंत गूढ प्रश्न आहे स्वतःसाठी. सर्व हालचाली भगवंताच्या शक्तीतून निर्माण होतात, ज्याला *कार्याची* उपमा दिलेली आहे. त्या कार्यामुळे अनेक रूप, आकार (स्मरण) जन्माला येतात, काही काळ वावरत राहतात आणि नंतर विरघळून जातात इतर रुपात. 

संबंध, गुंतागुंती, परिणाम हे कुणालाच सुटलेले नाही. दृश्यात येणे म्हणजे हा संबंधांचा खटाटोप स्थित होणार. म्हणून मार्ग असा, की शांत आणि स्थिर होण्याची गरज. त्यासाठी कर्तव्य, सैय्यम आणि श्रद्धेचा उपयोग करणे गरजेचे ठरते - त्यातून हेतू किंव्हा गोष्टींचा अर्थ प्रज्वलित ठेवावा. 

हरि ओम.

श्री

श्री 

मनाचे अस्तित्व म्हणजे कुठेतरी ते गुंतून राहणार. गुंतणे ही खूप सूक्ष्मातून येणारी क्रिया आहे, ज्यात बऱ्याच स्तरांचे समावेश किंव्हा संबंध होऊन वासना, विचार, भावना आणि देह चक्र होते आणि त्याचा परिणाम म्हणजे दृश्य जग किंव्हा द्वैताचे दर्शन निर्माण होत राहणे आणि ते भोगणे. शक्तीचे कार्य राहणारच अस्तित्वात, आणि त्यातील एक कार्य म्हणजे आपले मन/जीवाचे स्मरण. मन ही शक्ती आहे, तिला व्ययक्तिक समजून सुख आणि दुःख आपण निर्माण करत राहतो आणि त्यात गुंततो. मन माझे नाही, तुझेही नाही. ते भगवंताचे मानले तर मनाच्या अंतःकरणात त्याला भेटू. म्हणून मनावर सतत नामाचा संस्कार करावा, म्हणजे पूर्ण शक्ती भगवंताकडे वळवावी. 

दुसरा मुद्दा हा, की आपण/ मन नेहमी प्रवासात असतं. अनुभव येत राहणार, त्याचा प्रवाह असेल, त्यातून प्रश्न येतील, शोध असेल आणि त्यातून द्न्यानं कळेल. हे ही अपरिहार्य आहे. मन विघटित स्वरूपात असते. पण ते कालांतराने एक सत्याकडे येते आणि शांत होते. त्यासाठी "शोध" चालू राहते. ते शोध मोहीम समोर काहीही आणेल. ते स्वीकारावे आणि शांत रहावे. ह्याचा असाही अर्थ आहे की प्रवास कुणाला टाळता येत नाही. आजची परिस्थिती उद्या वेगळी होणार आणि हे चालू राहणार. त्या अर्थाने परिस्थितीत शांत रहावे आणि घाई करू नये प्रतिक्रिया द्यायला. सर्व योग्यच होत असते. आपली श्रद्धा हवी. 

तिसरा मुद्दा की विषय समजून दुरुस्तीच्या मागे लागणे, म्हणजे आणखीनच त्यात उगाचच गुंतणे. एखादी गोष्ट मनात संक्रांत कशी होऊ पाहते हे गूढ असते, पण ती होतेच. कार्य सुरू असतेच. 

अहं वृत्ती किंव्हा विघटित प्रकाराला चिटकवून राहिलो, तर आतील क्रिया तसे होत असते आणि कष्टी बनवत राहते. म्हणून अंतःकरण शांत होणे गरजेचे आहे. 

हरि ओम.

Sunday, March 15, 2026

श्री

श्री 

 

गोष्टी होत राहतात. तो अस्तित्वाचा गुण आहे. ते कसे, कधी, कुठे, का होतात - ती भगवंताची इच्छा असते.   गोष्टींच्या स्वभावावरून अणि होण्यावरून किंव्हा कुठल्याही हालचालीतून (मग ते आतील असू किंव्हा बाहेरील) आपण ठरत नाही किंव्हा सिद्ध होत नाही (संपूर्ण बौद्धिक अर्थ लावण्याची गरज नसते). अशा अनेक स्तर आहेत,जे बौद्धिक भाषेत ओळखता येत नाहीत, तरीही त्यांचा शांत मनाने स्वीकार होऊ शकतो. थोडक्यात सर्व निर्मितीचा प्रकार आणि परिणाम अस्तित्व शक्तीतून उद्भवते, त्यात आपण एक निमित्त/ घटक/ स्मरण/ भाव/ जाणीव  ठरतो. 

 

हे लिहिणे देखील आपल्या रूपातून निर्माण होते, अर्थातच त्याची प्रतिभा भगवंताने दिलेली असते. आपल्यातून सुरुवात करून शांती पर्यंत स्थित व्हायचे असते. हा मार्ग. आपण इथे कसे आलो, का आलो, कधी आलो, कुठून आलो हे सर्व प्रश्न भगवंताला सोपवा, म्हणजे संपूर्ण परिस्थितीचा स्वीकार करावा. हाच आपला मार्ग.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

 _हालचाली_ होत असतात दृश्यात. ती भगवंत शक्तीची इच्छा असते, म्हणून कार्य होते आणि अनेक स्तर प्रस्थापित होत राहतात आणि हालचालींचे अनेक रूप आणि आकार दर्शवत राहतात. 

 

भगवंताच्या स्मरणात कुठलाही क्षण वाया जात नसतो, कारण कुठल्या ना कुठल्यातरी स्तरात त्याचा योग्य परिणाम होत असतो. तो योग्य परिणाम शंका देईल, त्रास देईल, श्रद्धेचे महत्वही दर्शवून देईल. म्हणजे अंतर्मुख होण्याच्या प्रक्रियेत वाट्टेल ते उफाळून येण्याची संभावना असते, जे शांतीने आत्मसात करावे लागते. हीच शक्ती संचय होण्याची संकल्पना. 

 

जसं दृश्यात शक्ती वावरताना इंद्रियांच्या द्वारे परावलंबित प्रक्रियेत मग्न असते आणि त्यातून विचारांची धारा प्रस्थापित होते, तसंच अंतर्मुख होण्याच्या प्रक्रियेत मनात उलाढाल होत असते आणि त्यातून निराळी विचार धारा प्रस्थापित होत असते, ज्यावरून सत्य आत्मसात होते. 

 

म्हणून तसा निश्चय व्हायला लागतो की अंतर्मुख मार्ग निवडण्याचा. हा मार्ग पत्करल्यावर कुणाचे काय बिघडणार आहे?! सारे तर भगवंताचे असते, आपण उगाचच काळजी करतो की कुठे कमी पडले तर आणि कुठे फुगा फुटला तर! 

 

म्हणून राग गिळायला लागतो. कारण तो मर्यादा दर्शवतो. गोष्टी आपल्या अपेक्षा प्रमाणे होतीलच असे काहीही नाही. हे मान्य असावे. गोष्टी अशा पद्धतीने, कुठे, कधी, का घडतात...ह्यात व्याकुळ होण्याची गरज नाही. 

 

एकंदरीत वरील आपली (जीवाची) परिस्थिती बघता, ह्यात तारून शांती अनुभवण्याचा मार्ग म्हणजे तीन गोष्टी ध्यानात आणाव्यात: प्रयत्न (कर्तव्य), सैय्यम आणि श्रद्धा.  हाच दृश्यात राहण्याचा उचित मार्ग आहे.

 

योग्य वेळ आली की भगवंत दर्शन देणार. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

आपण शांत रहावे. सध्या इतके बदल सर्व पातळींवर होत असतात की त्यातून आपण ठरून घेण्याची चूक न करावी, कारण काहीच ठरणार नसते आणि त्यातून व्याकुळता का निर्माण करावी? आपल्याला प्रामुख्याने पाच गोष्टी शिकायच्या आहेत

 

१) कार्य आपल्या नकळत, सूक्ष्म माध्यमातही स्थित राहतं, म्हणून _करण्याला_ बरेच कंगोरे असतात, जे कळतात, नाही कळत, अर्धवट कळतात वगैरे. ह्या सर्व रूपाच्या प्रकारात _स्थिर_ राहण्याचा प्रयत्न करावे. 

 

२) काहीही अनुभवात येऊ घातले, तरीही सिद्ध होण्याची व्याख्या दृश्याच्या भाषेत मांडण्याची गरज नसते...कारण सिद्ध होण्याचा प्रकार _परावलंबित_ असतो. जिथे आजूबाजूच्या गोष्टीच खूप अस्थिर होत जात आहेत, तिथे त्यांच्यावरून सिद्ध होण्याची संकल्पना का अवलंबून करत राहावे?! आणि खरे सिद्धत्व भगवंताच्या शक्तित असते, त्यात आपण फक्त देणे लागतो. 

 

३) आपण मग कोण आहोत? इथे का आलो, काय करतोय, कशासाठी गुंतून राहतो, काय पाहिजे, कुठे जाणार आहोत- हे खूप महत्वाचे प्रश्न असतात स्वतःसाठी. त्यासाठी मार्ग आत्मसात करण्याचा शोध सुरू होतो. 

 

४) दुसऱ्यांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आपली नसते. त्यांच्या वृत्ती कशा शांत होतील, त्यासाठी आपण व्याकुळ न व्हावे. असे केल्याने असेही समजून घेऊ नये, की आपल्याला काहीच फरक पडत नाही. संसार सगळ्यांना मर्यादा शिकवतो. त्याच्यामुळे जे विचार आणि भावना उमटत राहतात, त्यातूनच शांतीकडे वाटचाल करावी लागते. म्हणून परिस्थिती पूर्णपणे स्वीकारावी लागते. आपण ह्या परिस्थितीत कर्तव्याची भाषा आत्मसात करावी.

 

५) सतत काहीतरी करत राहावे, गुंतून रहावे, खंत बाळगावे, रागाला धरावे - हे हिताचे ठरत नाही. स्वस्थ बसून राहिले, तरीही ते महत्त्वाचे असते आणि वेळ फुकट जात आहे, असे बिलकुल समजून घेण्याची गरज नाही. सर्व भगवंत योग्यच करतो. श्रद्धा वाढवावी.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

सर्व काही आपल्यात असते. आपण रिकामे नसतो. कुठे ना कुठेतरी आपल्या असण्याचा, वावरण्याचा योग्य परिणाम अस्तित्वात होत असतोच आणि आपले स्मरण कधीही वाया जात नाही. त्या अर्थी, आपण फक्त कर्तव्य करावे आणि संपूर्ण देत रहावे. देण्यासाठीही अंतःकरणात शुद्ध भाव स्थित होणे गरजेचा असतो, म्हणून देण्याने हे साधायला होते. ज्याला मी असे म्हणतो, ती देखील भगवंताची इच्छा आणि कार्य दर्शवते म्हणून तो सर्व काही योग्य करतोच, मग काळजी ती कसली?! 

 

प्रश्नांचे उत्तरे ओळखण्यासाठी वेळ द्यावा आणि श्रद्धा शक्ती वाढवावी. श्रद्धा बुद्धीने कळत नाही. बुद्धी अशी वापरून बघितली तर श्रद्धा यावी, हा तर्क झाला. श्रद्धा येण्यासाठी भगवत कृपा लागते. 

 

म्हणून बुद्धी परिवर्तित होण्यासाठी प्रयत्न, सैय्यम आणि कर्तव्य करावे. बुद्धीला कार्य केल्याशिवाय स्वस्थता (भगवंताची जाणीव) मिळणार नाही. म्हणून कार्यातून तिला शांत करावे. त्या कार्याचे रूप म्हणजे प्रयत्न, कर्तव्य, सैय्यम असे आहे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

काही अवघड विचार किंव्हा शब्द मांडण्यासाठी काही अनुभवातून जाणे येते. ते आपल्या हातात नाही; कधी ते अवघड क्लिष्ट वेदनादायक भावना मांडावे, हे सांगणे अत्यंत कठीण. घाई करून नाही चालत; आणि दुर्लक्ष करूनही. अशा परिस्थितीत काय करावे, असा प्रश्न पडावा स्वतःला. 

 

मला वाटते की भोग असतात, ते स्वीकारायला लागतात. त्यातून कोण चूक किंव्हा बरोबर असे बघू नये. आत्ता मुद्दा सांगणे कठीण का वाटते ह्याचे कुणी स्पष्टीकरण जरी विचारले तरीही अंतःकरण जाणून घेऊन निर्णय घ्यावे. निर्णय निमित्त झाले. त्याचे फळ काय यावे, ते श्रद्धेवर सोडावे. 

 

असा विचार करावा सतत. काही विचार आणि भावना आत खूप आघात देत असावेत. विचार जरी त्रासदायक वाटले, तरी शांत राहण्याचा (म्हणजे सैय्यम, श्रद्धा, कर्तव्य) सतत निश्चय करावा. 

 

एक घाव दोन तुकडे कुणालाही त्वरित करणे शक्य असते पण मुद्दा हा आहे की त्याचा प्रभाव खूप खोलवर आणि खूप काळासाठी तरंगत राहतो. वृत्तीचेही तेच आहे. वृत्ती शांत कालांतराने होणार...त्यासाठी अनेक अनुभव, स्तर, चक्र आत्मसात करावे लागणार. कारण अस्तित्वाच्या अनुभवात भगवंत भाव आणि जीवाचा भाव अशा दोन गोष्टींचा परिणाम होत असतो, आपल्याला मार्ग तो पत्करणे आलेच. 

 

वेदनांसाठी स्वतःला दोष देणे त्वरित बंद करावे. गूढ भाव ओळखण्यात श्रद्धा ठेवावी. कशालाही घट्ट पकडण्याची गरज नसते. आणि तसे जरी होत असले, तरीही भगवंताचे चिंतन करत राहावे म्हणजे कालांतराने दृश्यांची पकड सुट्टी होते.

 

असा विचारही येऊ शकतो, की थेट कोड सोडवणे अपेक्षित नसते का, इतर बाजूचे प्रयत्न करण्यापेक्षा? हा विचार तसा जरी सरळ वाटत असला, तरी प्रत्यक्षात नेहमी ते शक्य होईल असे काही सांगता येत नाही. बाजूचे प्रयत्न देखील कालांतराने तेच कोडे थेट सोडवतील! आणि थेट कोड्यामध्ये हात जर घातला तर प्रकरण चिघळूही शकते! तात्पर्य, कोडे कधी आणि कसे सुटेल हे आपल्या हातात असत नसते...ते श्रद्धेने भगवंताकडे सोपवावे. ह्याचा परत अर्थ असा निघतो की कोडी सुटण्या पर्यंत आपले कार्य करत राहावे - कर्तव्य, सैय्यम, श्रद्धा. 

 

हरि ओम.